
पं. नेहरूंनी इतकी प्रचंड विविधता असलेल्या देशाला एका सूत्रात गुंफलं, लोकशाहीची भरभक्कम पायभरणी करताना अनेक महत्त्वाच्या व्यवस्थांचं आणि संस्थांचं जाळं तयार केलं. इतकंच नव्हे तर, ज्या काळात जगाच्या व्यवहारात भारताला महत्त्व द्यावं असं काही आपल्याकडं नव्हतं, त्या काळात जगानं भारताचं ऐकावं, असा सन्मान मिळवला. नेहरूंच्या निधनानंतर नेहरूंविना जागतिक व्यासपीठ रितं वाटेल, असं पाश्चात्य माध्यमं लिहीत होती. कदाचित याच कारणांमुळे पं. नेहरुंना जवळुन अनुभवणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी देश की नेहरु अशी निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पं. नेहरुंना निर्विवादपणे झुकते माप दिले होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांइतकाच भारताचे पहिले पंतप्रधान पे. नेहरु यांचेही योगदान नाकारता येत नाही, सध्याच्या अस्वस्थ राजकीय वातावरणात पं. नेहरुंचा भारतीय राजकारणावरील प्रभाव धुंडाळण्याचा हा अल्पसा प्रयत्न…
भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला काय दिले? नेहरुंमुळेच तर भारतावर फाळणी लादली गेली… असे प्रश्न, आरोप येण्यास वा अशा प्रश्नांची सरबत्ती होण्याची सुरुवात आज – कालची नाही. पं. नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल तसे समकालीन. पहिल्या पंतप्रधानपदासाठी दोघेही लोकप्रिय उमेदवार होते, मात्र, पं.नेहरुंची बाजू वरचढ ठरली.. कदाचित कॉंग्रेसवर असणारा महात्मा गांधी आणि मोतीलाल नेहरुंचा पगडा हे एक कारणही त्यामागे असू शकते. सरदार पटेलांना मानणारा आणि प्रसंगी नेहरुंना विरोध करणारा कॉंग्रेसचा एक वर्ग नेहरुंच्या हयातभर कार्यरत होता. तेव्हापासून अगदी आजपर्यंत नेहरुंपेक्षा पटेल कसे वरचढ होते, ते उत्तम संघटक, कुशल पंतप्रधान ठरले असते, ते जर आणखी काही दिवस जिवंत राहिले असते तर भारताचा विकास अधिक वेगाने झाला असता… अशा खूप कंड्या पिकवल्या जात होत्या. या सर्वांना बळ मिळाले ते 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यामुळे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही पटेल यांनाच आपले गुरु मानून त्यांना श्रेष्ठ ठरवताना सातत्याने नेहरुंवर टिका केली आहे.
वास्तविक नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक स्वत:ची प्रतिमा उंचावण्याकरता स्वत:ची तुलना कधी इंदिरा गांधी तर राजीव गांधी यांच्यासह थेट पं. नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत करत राहिले आहेत. अर्थातच सत्ताधाऱ्यांकडे भाटगिरी करणाऱ्यांची वाणवा नसते. मोदींचे राजकीय, आंतरराष्ट्रीय धोरण, दूरदृष्टी यातील कौशल्य मान्य करतानाच त्याला असणारी स्वमग्नतेची घातक किनार हुकुमशाहीकडे नेणारी आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्वराज्याच्या लढ्यासाठी आंदोलने चालवण्याची योग्यता लागते तर राज्यकारभार चालवण्यासाठी प्रशासकीय योग्यता लागते. स्वाधीन देशाचा राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तिच्या अंगी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाचा गुण म्हणजे राजनैतिक दूरदृष्टी. हा गुण अंगी असणाऱ्या व्यक्तिला देशाच्या भूतकाळात वर्तमानकाळात जोडता येेते. आणि हल्ली कोणतीही आंदोलन, चळवळीची पार्श्वभूमी नसताना, वैचारीक बैठक नसताना झटपट सत्ताकेंद्रि येणाऱ्या नवोदित मंत्र्यांना नेहरुंचे श्रेष्ठत्व कळणार नाही.
सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक वकील मेगॅस्थॅनीज यांनी लिहीलेल्या काही प्रसंगाचा उल्लेख सध्याच्या भारतीय राजकारणाचा आणि राजकीय नेत्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी खूपच महत्वाचा ठरतो. ग्रीक वकीलाने असे लिहीले आहे की, एकीकडे युध्द भूमीवर घनघोर युध्द सुरु असताना शेजारच्या शेतातून शेतकरी युध्दाची अजिबात दखल न घेता आपल्या शेतीच्या कामात मग्न असत, कारण की त्यांना मनातून खात्री असे की, कुठलीही बाजू जिंकली तरी त्यांना कुठलाही उपद्रव होणार नाही. 21 व्या शतकांत आजच्या घडीला प्रत्यक्षात शस्त्रास्त्रांनी युध्द होत नसले तरी केवळ शब्दांच्या जोरावर लढल्या जाणाऱ्या राजकीय लढाया आणि जिंकून आल्यानंतर ज्यांनी मतदान केले त्यांचीच कामे करण्याची मानसिकता पाहिली की, चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील शेतकरी अधिक सुखी होता, असे म्हणावेसे वाटते, कारण त्याला राजकारणाची झळ कधी लागत नव्हती.
समाजवाद आणि लोकशाही हे परस्पर विरोधी आहे आणि त्यामुळे लोकशाहीयुक्त समाजवाद हा चालू व्यवस्थेत बदल न करण्याच्या इच्छेवरचा केवळ मुखवटाच ठरेल. हा मुद्दा नेहरुंना अजिबात पटत नव्हता असे त्यांना जवळून ओळखणारे जाणकारांनी सांगून ठेवले आहे. नेहरु नेहमीच समाजवादाचे पुरस्कृर्ते राहिले आहेत. नेहरुंनी कोणत्या कारणामुळे सुखासीन जीवनाकडे पाठ फिरवली याला विशेष महत्व नाही, भारतात आल्यावर ते एका खास युरोपियन लोकांसाठी असलेल्या संस्थेचे सदस्य होउ इच्छित होते, मात्र याला व्यवस्थापकांनी परवानगी दिली नाही. कदाचित यामुळे ते इंग्रजी राज्याचे विरोधक झाले असतील, ते सिमल्याहून आगगाडीने परत येत असताना त्यांच्या डब्यातील दोन सैनिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या जालियनवाला बाग येथील रक्तपातासंबधी व्यक्त केलेला खूनशी आनंद पाहून त्यांच्या मनात इंग्रजी राज्याबद्दल तिटकारा निर्माण झाला असेल, कारण कोणतेही असो नेहरुंनी स्वराज्याच्या लढ्यात भाग घेतला 9 वर्षे तुरुंगवास भोगला, आणि ज्यावर त्यांचा जन्मसिध्द अधिकार होता अशा सुखासीन जीवनाकडे पाठ फिरवली हे निर्विवाद सत्य आहे, याबाबतचे संदर्भ नेहरु हयात असताना आणि नसतानाही प्रकाशित करण्यात आलेल्या अनेक हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांत हमखास आढळतो.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. आयर्लंडमध्ये झालेल्या सिन फेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं. भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता. 1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर कॉंग्रेसला उपस्थित राहिले. 1919 मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. त्यांनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. 1920-22 दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.
1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. 1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि कॉंग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे आत्मचरित्र पूर्ण केलं. भारतीय राजकारण आणि प्रशासनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या पंचावार्षिक विकास योजना, स्थानिक स्वराज्य संस्था परराष्ट्र धोरण, नीती आयोग, राष्ट्रीय सुरक्षा आयोग, काश्मिरला भारताचा भाग ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय अशा अनेक विकास योजना केवळ पं.नेहरुंच्या विकासात्मक दूरदृष्टीकोनामुळीच साध्य झाल्या आहेत. यातल्या बहुतांश योजना आजही नावात बदल करुन वापरल्या जातात, यावर कोणाचे दुमत असू नये.
व्यंग्यचित्रं काढताना मलाही सोडू नका, असं सांगणारे नेहरू पचनी पडणं सोपं नाही. प्रत्येक कर्तृत्ववान माणसाला त्याच्या काळाच्या आणि भोवतालच्या परिस्थितीच्या मर्यादा असतातच. नुकतेच ‘चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या एका कार्यक्रमात जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वक्तव्य करुन वाद उकरुन काढला आहे. फाळणीला जिना नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल कारणीभूत आहेत, असं वक्तव्य फारुक अब्दुल्लांनी केलं. जिना यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली, असं जग मानतं, मात्र त्यात तथ्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झाला, असं अब्दुल्ला म्हणाले.
मुळात स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीर भारतात राहील, याची खात्री कुणाही प्रमुख भारतीय नेत्याला वाटत नव्हती. निर्णायक क्षणी नेहरूंनी काश्मीरचं सामिलीकरण स्वीकारलं आणि एकदा स्वीकारल्यानंतर तो देशाचा भाग राहील, याची पुरती तजवीजही केली. काश्मीर एकदा भारतात आल्यानंतर तो भारतातच राहील; इतकच नव्हे तर, तो अधिकाधिक एकात्म होईल, यासाठी नेहरूंनी जे काही केलं, ते धूर्त राजकारण होतं. त्यासाठी शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकताना त्यांनी मागं-पुढं पाहिलं नव्हतं. एका टप्प्यावर भारताची फाळणी अनिवार्य म्हणून तत्कालीन सर्वच नेत्यांनी स्वीकारली. यात सर्वात शेवटचे महात्मा गांधी होते. महंमद अली जीना यांनी तयार केलेल्या स्थितीत दुसरा पर्याय नव्हता. मात्र, त्यापेक्षा भयंकर अशी योजना माउंटबॅटन यांनी तयार केली होती. ती मोडून काढण्यात नेहरूंचाच पुढाकार होता. तत्कालीन बॉम्बे (मुंबई) उत्तर, बंगाल, आणि मद्रास या प्रांतांकडं ब्रिटिश राज्याचा वारसा सोपवावा, अशी कल्पना ब्रिटिश मंत्रिमंडळानं मंजूर करून पाठवली होती. हे लक्षात आल्यानंतर त्याला कडाडून विरोध करणारे आणि यातून देशाचे अनेक तुकडे पडतील, हे सांगणारे नेहरूच होते. याविषयी सविस्तर लेखन व्ही. पी. मेनन यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर या पुस्तकात केलं आहे. नेहरूंनी इतकी प्रचंड विविधता असलेल्या देशाला एका सूत्रात गुंफलं, लोकशाहीची भरभक्कम पायभरणी करताना अनेक महत्त्वाच्या व्यवस्थांचं आणि संस्थांचं जाळं तयार केलं. इतकंच नव्हे तर, ज्या काळात जगाच्या व्यवहारात भारताला महत्त्व द्यावं असं काही आपल्याकडं नव्हतं, त्या काळात जगानं भारताचं ऐकावं, असा सन्मान मिळवला. नेहरूंच्या निधनानंतर नेहरूंविना जागतिक व्यासपीठ रितं वाटेल, असं पाश्चात्य माध्यमं लिहीत होती. कदाचित पं. नेहरुंना जवळुन अनुभवणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी देश की नेहरु अशी निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नेहरुंना झुकते माप दिले होते. यशवंतरावांनी हा निर्णय का घेतला असेल याविषयी आजच्या घडीलाही उहापोह होताना दिसतो आहे. यशवंतरावांना महाराष्ट्रासाठी काही उपयुक्त योजना राबविण्याची संधी नेहरुंनी अग्रक्रमाने दिली होती, त्यातच नेहरुंचे मोठेपण सामावले आहे.
निंदकाचे घर असावे शेजारी… या उक्तीचा आदर करीत जगणारी सामान्य माणसे कोणाच्याही माघारी कधी टिका करायला धजावत नाहीत, मात्र ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा, सत्तालोलुपता असते, प्रसंगी हुकूमशाही राबवायची आस असते, असे लोक दुसऱ्याची रेष खोडून आपली रेष समारे आणायला बघतात… पण ते हे विसरतात की, कोणाची रेष पुसून कोणी मोठा होत नाही, त्याकरता कर्तबगारीची रेष थोडी मोठी करावीच लागते… त्या तुलनेत सतत नेहरुंवर टिका करुन त्यांना बदनाम करणाऱ्या मोदी भक्तांना असे पाच वर्षाच्या सत्ताकाळामुळे नेहरुंचे महत्त्व आणि त्यांच्याविषयी समान्यांच्या मनात असणारा आदरही कमी करता येणार नाही.. हेच वास्तव आहे.



