मुख्य स्टोरी

आयर्न लेडी ते नमो!

- अ‍ॅड. योगिनी बाबर

उठावदार कामगिरी अन् थेट जनसामान्यांच्या मनात राज करणारे पंतप्रधान म्हणून आज फक्त दोनच नावे भारतीय नागरिकांच्या मनात नोंदली गेली आहेत.
‘आयर्न लेडी’ अर्थात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा १९ नोव्हेंबर १९१७ हा जन्मदिवस. आजपासून इंदिराजींचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, दखलपात्र, उठावदार कामगिरी अन् थेट जनसामान्यांच्या मनात राज करणारे पंतप्रधान म्हणून आज फक्त दोनच नावे भारतीय नागरिकांच्या मनात नोंदली गेली आहेत. अर्थातच ही नावे आहेत इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची.. आजही ग्रामीण भागातल्या महिलांना काँग्रेस म्हणजे इंदिराजींची आय काँग्रेस आणि भाजप म्हणजे नरेंद्र मोदींचे कमळ इतकेच माहीत आहे.
जगभरातील महिलांकरिता १९७५ साल तसे किमान माणूसपणाच्या, स्त्रीमुक्ती विचारांच्या स्वीकाराची सुरुवात करणारे क्रांतिकारी वर्ष ठरले. तसे ते महिला जगतासाठी प्रभावशाली आणि कायमच नोंद घेणारे वर्ष ठरले. सत्तरीच्या दशकांत नेतृत्व करणा-या अनेक सजग महिलांनी आपापल्या समाजाकरिता, देशाकरिता, प्रांताकरिता पुरोगामित्वाची, प्रबोधनाची, लिंगभेद जाणिवांची आणि समानतेची, पुरुषी मानसिकतेची, विज्ञान, तंत्रज्ञानाची हाक दिली. जनजागृती केली.. अनेक प्रथा, रूढी, अन्याय पारंपरिक जोखडातून बाहेर पडण्यास महिलांना उद्युक्त केले. १९७५ हे जसे स्त्री विश्वाकरिता आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती वर्ष म्हणून दखलपात्र ठरले, तसेच १९७५ हे वर्ष भारतीयच नव्हे तर जगभरातल्या राजकीय विश्वात खळबळजनक आणीबाणीमुळे आजही आणि पुढच्या राजकारणातही दखलपात्र ठरले. अर्थातच लोकशाही भारताच्या राजकारणात राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित आणीबाणी लादली गेली आणि ती लादणा-या होत्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, शतकातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ज्यांना गौरवण्यात आले त्या इंदिरा गांधी. यानंतर अर्थातच लोकभावनेचा उद्रेक झाला. काँग्रेसची सत्ता गेली. इंदिराजींनीही राजकीय आणि व्यक्तिगत पातळीवर अनेक संघर्ष पचवले. आपले म्हणणारे अनेकजण दूर गेले आणि इंदिराजींनी राजकीय अज्ञातवास अनुभवला. मात्र ‘ब्लँक अ‍ॅण्ड ब्लॅक टाईम इज गोल्डन टाईम’ असे म्हणत इंदिराजींनी या अज्ञातवासातला अंधकार खंबीरपणे आणि सक्षमपणे दूर केला. त्या पुन्हा सत्तेवर आल्या आणि त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या सत्ताकाळात इंदिरा गांधी नामक वादळाने एक झंझावात कायम ठेवला. विज्ञान, तंत्रज्ञान, सैन्याला उभारी देण्याची भूमिका, आधुनिक शेतीतील हरित क्रांतीचे प्रयोग, सॅटेलाईट उपग्रह, आरोग्य सेवा, ज्येष्ठांकरिता पेन्शन योजना, शैक्षणिक सोयी-सुविधा आदी अनेक धोरणात्मक निर्णयात त्यांनी बाजी मारली. काँग्रेस काळात बोफोर्स प्रकरण गाजले तर सध्या राफेल विमानांची खरेदी धुमसते आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा १९ नोव्हेंबर १९१७ हा जन्मदिवस. इंदिराजींचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मापासूनच त्या भारतीय राजकारणाचा एक अविभाज्य घटक होत्या. मग त्यांचा राजकीय प्रवेश असो वा वरिष्ठांना डावलून त्यांना केवळ घराणेशाहीने मिळालेले पंतप्रधानपद असो. त्यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय वा सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन अशा सर्वच पातळ्यांवर त्यांची कारकीर्द चर्चेची आणि दीर्घकाळपर्यंत परिणाम करणारी राजकीय वाटचाल ठरली आहे. या संपूर्ण शतकांत भारताला मिळालेल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, दखलपात्र, उठावदार कामगिरी आणि थेट जनसामान्यांच्या मनात राज करणारे पंतप्रधान म्हणून आज फक्त दोनच नावे भारतीय नागरिकांच्या मनावर नोंदली गेली आहेत. अर्थातच ही नावे आहेत इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. आजही ग्रामीण भागातल्या महिलांना काँग्रेस म्हणजे इंदिराजींची आय काँग्रेस आणि भाजप म्हणजे नरेंद्र मोदींचे कमळ इतकेच माहीत आहे आणि हे वास्तव आहे. अनेक काँग्रेसजनांनी इंदिराजींच्या पुढे जात आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जागा ना त्यांचा मुलगा, सून आणि नातू घेऊ शकले ना ही त्यांचे विरोधक. जे इंदिराजींच्या बाबतीतले वास्तव आहे, आज तेच वास्तव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या माध्यमातून समोर येते आहे. या दोन्ही पंतप्रधानांनी संपूर्ण शतकातील चर्चेतले पंतप्रधान अशी आपली छाप पाडली आहे आणि यावर कोणाचे दुमत असू शकत नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर काही काळ राजकीय वनवास, अज्ञातवास भोगला. त्याच पद्धतीने गुजरातमधील गोध्रा जळीतकांडानंतर एक आरोपी, देशद्रोही आणि जातीयवादी अशा अनेक आरोपांमुळे नरेंद्र मोदी अडचणीत आले होते. त्यांना अनेक देशांनी आपल्या देशात प्रवेश करण्यास, भाषण देण्यास मज्जाव केला होता. तब्ब्ल आठ देशांनी त्यांच्या प्रवेशावर निर्बंध घातले होते. गुजरातचे मुख्यमंत्री इतकीच ओळख शिल्लक राहते की नाही, अशी परिस्थिती असताना मोदींनी अचानक मुसंडी मारली आणि २०१४ हे साल आपल्या नावावर देशभरात कोरले, ते आजतागायत. भले इंदिरा गांधींच्या तुलनेत त्यांना मिळालेल्या पंतप्रधानपदाचा कालावधी अगदीच नगण्य मानला जाईल, पण नरेंद्र मोदींनी जेमतेम चार वर्षात दूरदृष्टीने, कधी सामोपचाराने, कधी चर्चेद्वारे तर कधी थेट अंमलबजावणी करत लागू केलेले निर्णय अगदी इंदिराजींच्या धडाकेबाज निर्णय प्रक्रियेची तुलनात्मक आठवण करून देणारे ठरले आहेत. इंदिरा गांधी यांनाही आपल्या पक्षातील अनेक ज्येष्ठ, लायक व्यक्तींना डावलून पंतप्रधानपदाचा मान मिळाला होता. तेव्हा त्या महत्त्वाकांक्षी, घराणेशाही राबवणा-या आहेत, ‘गुंगी गुडिया देश का क्या भला करेगी..?’ अशी त्यांची हेटाळणी झाली. अगदी तशाच घटना नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या वेळी घडल्या. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी अनेक ज्येष्ठ अनुभवी नेत्यांना डावलून अचानक मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर झाले आणि ते पदावर विराजमानही झाले. त्यावेळी मोदींना फक्त हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. आता फक्त ब्राह्मण ही एक जात शिल्लक राहणार. दलित, मराठा, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या अधिकारावर गदा येणार. हिंदू राष्ट्र या संकल्पनेला मान्यता द्यावी लागणार, आदी अनेक आरोप करण्यात आले. मात्र स्वकीयांसोबतच विरोधकांवरही मात करत पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिमा जनसामान्यांचा, आम आदमीचा कैवारी अशीच रुजवली. म्हणूनच नोटाबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राइक्स आदी निर्णयाचे सामान्यजनांनी स्वागतच केले.
आज या दोन धुरिणांची तुलना करण्याचे आणखी एक प्रयोजन म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा इंदिरा गांधींनी ‘गरीबी हटाव’चा नारा दिला तेव्हा उदयोजकतेला चालना देणा-या या ना-याचा विरोध करताना विरोधकांनी ‘इंदिरा हटाव’ची घोषणा केली. आज नरेंद्र मोदींनी जेव्हा ‘भ्रष्टाचार हटाव’ची घोषणा करताना नोटाबंदी लागू केली, तेव्हा विरोधकांनी ‘मोदी हटाव’ची घोषणाबाजी सुरु केली. दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम राहात निर्णयाची अंमलबजावणी करीत होते, आहेत. दोघांच्याही शब्द कोशात अशक्य ही गोष्ट नाहीच. म्हणूनच तर ‘गुंगी गुडिया’ म्हणून ज्यांना खिजवले त्यांनी आपली नोंद ‘आयर्न लेडी’ म्हणून विरोधकांनाच नाही तर जगभरातल्या राजकीय सत्तास्थानांना घ्यायला लावली. तर दुसरीकडे ज्या नरेंद्र मोदींना गुजरात प्रकरणी अनेक देशांनी ‘नो एन्ट्री’ केली त्या देशांसह आज जगभरातला लहान मोठा प्रत्येक देश त्यांच्यासाठी पायघडय़ा घालत आहे. हा करिष्मा केवळ एका व्यक्तीचा निश्चितच नाही. हा करिश्मा आहे विचारांचा, ध्यासपूर्ण, अभ्यासक वृत्तीचा. आपले ध्येय निश्चित करतानाच येणा-या अडथळ्यांची तमा न बळगता सातत्याने कार्यमग्न असण्याचा आणि जो वाईट म्हणेल, विरोध करेल त्यालाही आणि जो सोबत करेल, समर्थन करेल त्यालाही आपल्या विचाराच्या दिशेने सोबत नेण्याच्या वृत्तीचे हे द्योतक मानता येणार आहे. कदाचित हेच या दोघांमधले नोंद घेण्यायोग्य समान दुवे आहेत, ज्यामुळे दोघांचेही विरोधक आणि समर्थक त्यांना भिडण्यापूर्वी अभ्यासाला लागतात. नाही म्हणायला एक गोष्ट दोघांमध्ये अगदीच भिन्न आहे आणि ती म्हणजे मोदींनी आपल्या भोवती नात्याचा कोणताच बंध ठेवला नाही वा नात्यातील कोणालाच राजकीय फायदा घेऊ दिला नाही. इंदिरा गांधींकडे मात्र जन्मापासून आणि मृत्यूपश्चातही राजकीय घराणेशाहीच्या परंपरेची जपणूकच झालेली दिसते. म्हणूनच आजही काँग्रेस पक्ष म्हणजेच गांधी घराणे अशी ओळख रुढ आहे. या दोघांनाही राजकीय अंखडीत प्रवासात जाणवलेला आणि जाणवणारा महत्वाचा धोकाही हाच की, केवळ धर्म, राजकीय महत्वाकांक्षा, आणि स्वार्थी राजकारण या भोवती सत्ताकेंद्रे फिरवत ठेवली आणि लोकशाहीपासून राजकारण दूर जात राहिले तर सार्वसामान्य जनताही अशा सत्तेपासून फारकत घेतेच. हे वेळीच ओळखून मतदाराचा मूड समजून घेणे, तो सांभाळणे आणि त्याबर हुकूमी राजकारण करणे व्यावहारिक पातळीवर योग्य ठरते. हेच तर तेव्हाच्या आणि आताच्या पंतप्रधानांपुढचे मोठे आव्हान होते आणि आहे.

Related Articles

Back to top button