

जगामधले अक्षर वाङ्मय म्हणून मान्यता प्राप्त आणि लोकप्रिय असणारे कोणतेही धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक साहित्य असो त्यामध्ये एक व्यवच्छेदक घटक नक्की आहे, तो म्हणजे ‘स्त्री’ चारित्र्य!
स्त्री, मग ती वनवासी, गिरीजन, हरिजन, शिक्षित, अशिक्षित, उच्चविद्याभूषित आणि सुसंस्कृत कोणतीही असली तरी तिच्या वैचारिक क्षमतेवर शंभर टक्के विश्वास ठेवलेला दिसत नाही. उलट तिला प्रगल्भतेच्या अनेक कसोट्या पार करूनच स्वत:ला सिद्ध करावे लागले आहे! तिच्या व्यक्तिमत्वामधील अनेक कंगोरे दुखरेच राहिलेले दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर, रामायण जरी नायक प्रधान वाटत असले तरी घडले कैकेयी, सीता आणि मंथरेमुळेच! आहे ना कहानी में व्टिस्ट!
राम हा पुरुषोत्तम समजला जातो. ओ.के. सीता पाच पतिव्रतांमध्ये पहिल्या नंबरवर आहे. पण मला वि.स. खांडेकरांच्या एका नायिकेने विचारलेला प्रश्न सुद्धा विचारात घ्यावासा वाटतो. तो म्हणजे सीतेला रामाशिवाय भेटलेला परपुरुष रावणच होता. पण रामापेक्षा पराक्रमी, शूर, सर्वगुण संपन्न आणि देखणा पुरुष भेटला असता तर? याचे उत्तर शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, मला जे उत्तर मिळाले ते असे… तरीही सीता रामाशीच प्रामाणिक राहिली असती. कारण तिने पातिव्रत्य स्वखुशीने स्वीकारले होते. म्हणजे तिचा संयम रामा इतकाच उच्च कोटीचा मानला गेला पाहिजे. पण, उलट तिला अग्निपरीक्षाच द्यावी लागली! का? या प्रश्नाला बगलच दिली जाते? अर्थात, ही एक साहित्य कृती आहे. रामायणामधील व्यक्तिरेखा साचेबद्ध वाटतात. पण महाभारतामधील प्रत्येक पात्र जिवंत होऊन आपल्याबरोबर बोट धरून चालू लागते. पावलो-पावली भेटत राहते! आश्चर्याचे धक्के देत राहते. त्यांचे मनोवैज्ञानिक व्यापार, सुप्त अतिसुप्त मनातील भावनांचे उद्रेक, त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचे पराक्रम, त्यांची हार/जीत, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक जबाबदाऱ्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे सगळे तर्क सुसंगत वाटते, अर्थात काही अपवाद वगळून.
महाभारताच्या अरण्यकात आपण जसजसे स्वत:ला हरवत जातो तसतशी ही पात्रे अनेक प्रश्नांचे भडीमार करून आपल्या परतीचे मार्ग आडवून ठेवतात. हे असे का घडले ? कर्ण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही त्याच्यावर सतत अन्यायच का झाला? द्रोणाचार्यांनी एकलव्यावर अन्याय का केला? वगैरे वगैरे…

खलप्रवृत्तींना नको एवढे महत्व दिले गेले, उदा. शकुनी, दुर्योधन इ. महाभारतामधील प्रामुख्याने मनावर ठसणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे शकुंतला, मत्स्यगंधा, अंबा, अंबालिका, कुंती, माद्री, द्रौपदी, सुभद्रा, सत्यभमा आणि गांधारी !
संपूर्ण कथानकामधे कुंती आणि द्र्रौपदींचा ‘की’ रोल आहे. त्यांच्या प्रत्येक कृती पाठोपाठ प्रचंड उलथा-पालथी झालेल्या दिसतात, पण गांधारीच काय? तिला अस्तित्व नव्हते? तिला मानापमान नव्हते? तिला महत्वाकांक्षा नव्हत्या? की ती पूर्ण निर्बुद्ध होती? याचा आपण किती वेळा विचार केला आहे किंवा तिच्या शापवाणिचे तार्किक विश्लेषण आपण करतो का कधी? नाही, बहुतेक वेळी ती दुर्लक्षित आहे.
तसे विचार करतो, भारतीय शिष्ठाचारामधे स्त्री आदरणीयच आहे, असे बोलले जाते. कालपरत्वे दाखले द्यायचेच झाले, तर लक्ष्मी उद्योजकता, संपन्नतेचे प्रतिक. काली-अन्यायाविरुद्ध लढा देणारी आदिशक्ती. सद्सद्विवेक बुद्धी, शारदा-विद्या, ज्ञान-विज्ञान सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी इ. सदाचार, पावित्र्य यांचे सातत्य राखणाºया बुद्धीमान विदुशी होत्या; ती त्या-त्या काळाची गरज होती, सदाचार हा आजही गरजेचा आहे, समाजाच्या सुदृढ / निरामय आरोग्यासाठी, असे मी मानते!
आज, स्त्री-पुरूष संबंधांचे संदर्भ खूप बदललेले आहेत. परपुरुषांशी बोलणे, मैत्री करणे, त्यांच्या बरोबरीने जबाबदारीची पदे सांभाळणे याला आपण व्यभिचार नाही म्हणत. उच्चपदस्थ महिलांना आदराची वागणूक मिळते ही आनंदाची बाब आहे काळाची, ती गरजही आहे! या संदर्भामध्ये मला हिलरी क्लिंटल यांनी मोनिका लुइन्स्कीच्या प्रकरणात ज्या परिपक्वतेने आपल्या पतीला साथ दिली त्या घटनेची आठवण करून द्यावीशी वाटते, जी व्यक्ती उद्या अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची अध्यक्ष होणार आहे.
तसे, मी, सीता – मारूती, द्रौपदी-कृष्ण, कुंती-विदुर, मुक्ताई-चांगदेव, जनाबाई-नामदेव, बहिणाबाई-तुकाराम, जिजाबाई-दादोजी यांना एकमेकांचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी (फिलॉसॉफर) च मानते !

गार्गी-मैत्रेयीसारख्या विदुषी, मुक्ताईसारख्या अध्यात्म गुरू, जिजाऊ, अहिल्यादेवी आणि लक्ष्मीबाईसारख्या मुत्सद्दी रणरागिणींनी स्त्री स्वातंत्र्यासाठी कधीच लढा उभारला नाही. उलट त्यांच्या कर्तृत्वाला फुटणाऱ्या शक्यतांचे अनेक धुमारे त्यांनी नियंत्रणात ठेवून जाणिवपूर्वक स्वत:ला कर्तव्य, त्याग आणि प्रेम यांच्या चौकटीत बद्ध ठेवले होते.
अशीच, परस्पर विरोधी पदर असलेले व्यक्तिमत्व लाभलेली एक स्त्री मला संपूर्ण महाभारतभर अदृष्य रूपाने वावरतातना जाणवते, ती म्हणजे गांधारी! डोळस असूनही आयुष्यभर नेत्रहीन असल्यासारखे वावरायचे हा एक ‘नर्व्हस ब्रेकडाउन’च आहे, असे मला वाटते. पण, अशाप्रकारे कलेवर होऊन जगण्यापेक्षा कोणत्या तरी कलेवर प्रेम करावे हे सुद्धा तिला कसे साधले नाही याचे आश्चर्य वाटते. कारण गांधार देशची ती राजकन्या होती. कोवळ्या वयात हस्तिनापूर सम्राटाशी विवाह झाला, पण हा सम्राट जन्मांध आहे हे समजल्यानंतर तिला केवढा धक्का बसला असेल ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. त्याचीच ही अत्यंत प्रखर प्रतिक्रीया म्हणजे स्वत: डोळ्याावर आयुष्यभर पट्टी बांधून वावरणे पसंत करणे, निषेध तोही कायमचा, पण हा कुणाचा निषेध केला गांधारीने, स्वत:चा की स्वत:च्या प्राक्तनाचा?
विचार केला तर गांधारी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि जबरदस्त भूमिका बजावू शकली असती. कदाचित महाभारताच्या कथेला वेगळेच वळण मिळाले असते. पण तिने स्वत:च्या कर्तृत्वाच्या विस्ताराची सर्व क्षितिजे मायको चिपमध्ये कोंडून ठेवली आयुष्यभर! हा स्वत:च्या व्यक्तिविकासाला स्वत:च घातलेला अडसर नाही का? अनेक न सुटणारी कोडी गांधारीभोवती आवर्तने घेत आपल्यासमोर फिरत राहतात, तेव्हा आपण सुन्न होतो. तिने अंधसम्राटाबरोबर आयुष्य काढण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला होता? फार उदात्त हेतू मनात ठेवून?, ठिक आहे! नशिबी आलाच आहे, त्यात बदल होणे नाही त्याचा संसार करून त्याचे जीवन उज्ज्वल करू, असा उदात्त हेतू ठेवला होता का? पण मग स्वत:साठी का अंधाराची साथ निवडली? उलट आपल्या पुत्रांना डोळसपणे वाढवले असते तर किती छान होवू शकले असते!
तिने प्रेम केले, पण ते देणारा आणि घेणारा, दोघांची आयुष्ये उजळून टाकणारे, समृद्ध करणारे नव्हते, तर तेही आंधळेच ठरले, पंगू राहिले, जे धृतराष्ट्रावर तिने केले! तिचे दिव्य दान सुद्धा असेच शापित ठरले. देणारा आणि घेणारा, दोघांचेही नुकसानच झाले, स्वत: गांधारी आणि दुर्योधन!
उलट डोळे बांधूनही सजग राहिली असती, तिच्या मदतीसाठी किंवा तिला मानसिक आधार देण्यासाठी तिच्याबरोबर आलेला तिचा भाऊ शकुनीला आपल्या संसारात अवास्तव लुडबूड करू दिली नसती. आपल्या पुत्रांना खल प्रवृत्तीपासून वेळीच आवर घातला असता, तर कुरूक्षेत्रावरची अपरिमित जिवित हानी टळली असती. महाभारताला नवे आयाम लाभले असते! आजही हीच प्रवृत्ती समाजामधे एवढी प्राबल्याने पोसली गेली नसती, याची खंत वाटते.
धृतराष्ट्र, शकुनी आणि दुर्योधन या सगळ्या खलप्रवृत्ती. निगेटिव्ह एनर्जी. ज्या एका बिंदूपाशी येवून त्याला छेद न देता थबकू शकत होत्या. तो बिंदू गांधारी! अत्यंत महत्वपूर्ण बिंदू नव्हे, आधारस्तंभ बनू शकली असती, पण तिने तसा कधीच का प्रयत्न केला नाही?
तिने निर्धार केला असता तर धृतराष्ट्राचे बरेच निर्णय न्याय्य होवू शकले असते. तिने शकुनीच्या कपट कारस्थानांना यशस्वी होऊच दिले नसते. कितीही गुप्तता पाळली तरी राजघराण्यामध्ये प्रत्येकाचे गुप्तहेर सर्वत्र पेरलेले असतातच. द्रौपदीला पणाला लावण्याचे दुष्कृत्य ही ऐनवेळची कलाटणी असली तरी वनवासामध्ये असलेल्या पांडवांना ज्वालाग्रही महालामध्ये ठेवण्याचे ठरले, ते एका दिवसाचे काम नव्हते. अशा प्रकारचे कुटील कारस्थान रचले जाते आहे, याची कुणकुण गांधारीला लागलीच असणार, पण तिने ते घडू दिले. ती खरेच एवढी हतबल किंवा दुबळी होती का? याचे उत्तर ‘नाही’! कारण वरकरणी ती आपणास आपल्या शंभर पुत्रांएवढेच पांडवही प्राणप्रिय आहेत. असे दाखवत होती तरी तसे कृतीतून प्रकट होत नव्हते. उलट त्यांच्या पराक्रमी, सद्गुणी, अज्ञाधारकपणाचा व्यत्यय तिच्या पुत्रांच्या राज्याभिषेकाला नकोसाच वाटत होता.
निदान एक स्त्री, एक आई, एक सासू म्हणून तरी तिने पांडवांबरोबर कुंती आणि द्रौपदीला वनवास होवू नये याची तमा बाळगायला पाहिजे होती की नाही ?
आपले पती सम्राट धृतराष्ट्र यांना वेळोवेळी योग्य-अयोग्य, सुष्ट-दुष्ट यांच्या बाबतीत, दूरगामी होणाऱ्या परिणामांचा विचार तरी करायला भाग पाडले असते.
गांधार देशाची ही राजकन्या, विवाहानंतर, हस्तीनापुरी तिला आपले बंधू शकुनी यांचा आधार म्हणून फार दिलासा वाटत असला तरी आपल्या पुत्रांपेक्षा सर्वच क्षेत्रात सरस ठरणाºया पांडवांना नामोहरम करणाऱ्या शकुनीला कधीच थांबवले का नाही?
शकुनीशी आपण अबोला धरला आहे असे दाखवत असली तरी त्याच्या कुटील कृत्यांना मूक संमती का देत राहिली? वेळीच त्याची बोळवण त्याच्या घरी का नाही केली?
सर्वाधिक नुकसान झाले ते दुर्योधनाचे. त्याच्या पराक्रमाला, सुसंस्कारांची जोड जर कोणी देवू शकत होते तर ती होती गांधारी, पण तिने ते जाणीवपूर्वक आपल्या आंधळ्या मायेपोटी टाळले.
पुन्हा प्रश्न पडतो, व्यासांच्या एवढ्या उत्तुंग प्रतिभेने गांधारीला का न्याय दिला नाही? या अगदी खल नाही, पण नकारात्मक व्यक्तिरेखेला थोडी तरी औदार्याची झालर असती तर जरा सुकून मिळाला असता.
की व्यासांनी तिला जाणून बुजून तसे रंगवले आणि प्रत्येक पिढीमधल्या आई, बहीण, पत्नी यांना सुचवले आहे, हे बायांनो आपल्या वडिलांवर, भावांवर, पतीवर विशेषत: आपल्या अपत्यावर आंधळे प्रेम करू नका. त्यांच्या खलत्वाला खतपाणी घालू नका. त्यांच्या चुकांकडे कानाडोळा करू नका. प्रसंगी आपल्याकडे वाईटपणा घेवून त्यांना अध:पतना पासून परावृत्त करा! त्यांच्या यशामधे स्वत:ला कृतार्थ माना, पण त्यांना प्रथम अपयश पचवायला शिकवा नाही तर महाभारताची पुनरावृत्ती अटळ!
गंधारी तू चुकलीस असे म्हणू की तिचे प्रारब्ध कुणीही बदलू शकले नाही असे म्हणू? शेजारच्या दारी सुखाचे रोप रूजवले तर आनंदाची फुले आपल्या अंगणीच बरसणार आहेत, हे गांधारीला कोणी सांगितले का नाही?
हृदयाची सहस्र शकये उराशी कवटाळून आयुष्यभर सम्राज्ञीपद उपभोगलेल्या गांधारीचे जीवन मोरपीसावरच्या असंख्य, देखण्या पण दृष्टीहीन नेत्रांसारखेच नाही का?
धन्यवाद! पुन्हा एकदा अभिवादन, आज आपण, मला माझे विचार आपल्याबरोबर शेअर करण्याची संधी दिलीत यासाठी मी आभारी आहे. नुकतेच, दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रकाशाची पूजा केली. पण या प्रकाशाची महती अंधाराशिवाय समजणारच नाही. अशाच एका अंधाराच्या सखीची व्यक्तिरेखा मी आपल्यासमोर उलगडली आहे. कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ असतीलही!




